सावदा येथे तणावपूर्ण शांतता

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० ऑक्टोबर २०२२ | जमावाने दुचाकी आणि चारचाकींची तोडफोड केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या बंदोबस्तामुळे तणावपूर्ण शांतता आहे.
सावदा शहरात काल रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सुमारे चार-पाचशे जणांच्या जमावाने गांधी चौक, चांदणी चौक आदी भागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. अवघ्या काही मिनिटांमध्ये धुडगुस घालून हा जमाव तेथून निघून गेला. यात दोन चारचाकी आणि तीन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जमावाने काही दुकानांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराची माहिती मिळताच सावदा पोलीस स्थानकाचे एपीआय देविदास इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला ? याची माहिती मिळालेली नाही. तथापि, सोशल मीडियातील एका पोस्टमुळे संतप्त झालेल्या जमावाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

दरम्यान, सावदा शहरातील स्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like