‘खान्देश रन’ मध्ये जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकारी धावले

बातमी शेअर करा

सुरक्षा विभागातील महेंद्र राजपूत 10 कि.मी.मध्ये तृतीय, वयस्क वयोगटात भीमराव अवताडे द्वितीय

खान्देश लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित ‘खान्देश रन’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे तब्बल 1000 हून अधिक सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यातील अनेकांनी 3, 5, 10, 21 कि.मी. मॅरेथॉन रन यशस्वीपणे पूर्ण केली. हजारो धावपटूंमधून 10 कि.मी. पुरूष गटात जैन इरिगेशनमधील सुरक्षा विभागातील सहकारी महेंद्र राजपूत तृतीय क्रमांकाने विजेता ठरला. तसेच वयस्क वयोगटात टाकरखेडा येथील सुरक्षा विभागातील सहकारी भीमराव अवताडे यांनी 10 कि.मी.मध्ये द्वितीय क्रमांकाने विजेते ठरले. त्यांना खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी, सन्मानचिन्ह यासह पाच हजाराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

‘खान्देश रन’च्या 6 व्या मॅरेथॉनची पहाटे 5.30 वाजता सुरूवात झाली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश चोरडिया यांनी 21 कि.मी. मॅरेथॉन रन ला हिरवी झेंडी दाखविली. यानंतर पोलीस अधिक्षक एम राजकूमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, महापौर जयश्री महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी. डी. बच्छाव, मनोज शिंदे, मनोज अडवाणी, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांनी प्रत्येक मॅरेथॉन रनच्या धावपटूंचा उत्साह वाढविला.

जैन परिवारातील अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मन जैन यांनी प्रत्यक्ष खान्देश रनमध्ये सहभाग घेतला. जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क, टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा, जैन एग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूड पार्क, डिव्हाईन पार्क मधील सहकारी, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती स्कूल प्रायमरी, अनुभूती स्कूल सेकंडरी मधील विद्यार्थी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी, भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे सहकारी, जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्साहाने खान्देश रन महोत्सवात सहभाग घेतला. यात वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. प्रत्येक वर्षी जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आलेले आहेत. कोरोना नंतरच्या काळात यंदा प्रथमच होणाऱ्या खान्देश रन ह्या उपक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.

जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहरी जाऊ नये, त्याचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवली आहे. आरोग्याच्या दृष्टीने सजग होत, निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी, यासाठी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सहकाऱ्यांना कान्हदेश रन मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like