खान्देश लाईव्ह | २५ मार्च २०२२ | कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षरित्या शाळा सुरू करण्यात आल्या.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेत आहे. राज्यातील आस्थापने आणि कार्यक्रमांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत. राज्याचा शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, सर्वसाधारपणे प्रत्येक वर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रामध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जाते.
यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना मुकावं लागणार आहे.राज्यातील शाळा १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं परवानगी दिली आहे. पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे एप्रिलच्या अखेरपर्यंत शनिवारी शाळा पूर्ववेळ आणि रविवारी ऐच्छिक स्वरुपात सुरू ठेवण्याचेही आदेश दिली आहेत.
इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा कधी घेण्यात याव्यात या संबंधीच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करावेत असे आदेश दिले आहेत.